कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

बुधवार, १० मे, २०१७

साठीतील विजनवास

साठीतला विजनवास

                       भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीने "मातृपितृ देव भव"आईवडिलांना देवाचे स्थान दिले आहे. जगातील कोणत्याच संस्कृतीने एवढे मोठे स्थान आईवडिलांना दिले नाही. पण हीच संस्कृती आमची तरूण मंडळी विसरत चालली आहे. वृध्दाश्रम हे या तरुण पिढीने जन्मला घातलेले दैत्य. आपले सुख त्यागून जे सतत लेकरासाठी झटतात.लेकराच्या सुखात जे आपलं सुख मानतात ते आईबाबा.जो मुलगा पाहिजे म्हणून देवाला नवससायास करतात. कधी जन्म येणा-या मुलीची हत्या करून आपल्या डोक्यावर ब्राह्महत्येचे पातक घेतात ते आईबाबा. घरात वंशाला दिवा हवा म्हणून अनेक दिव्यातून जातात ते आईबाबा. म्हातारे झाले की आम्हाला अचानक नावडू लागतात. आणि आईबाबांची रवानगी होते वृध्दाश्रम नावाच्या तुरूंगात का?
                        असंख्य उत्तरे आहेत. मुलगा सून दोघेही नोकरीला असतात. किंवा मुलगा बाहेर देशात असतो.घर छोटंसं असते.सासूबाई सुनबाई कुणी तरी भांडकुदळ असतात. आईवडिलांची काळजी घेणारा कुणी नसतो.किंवा वंशाच्या दिवाच नसेल.कदाचित काही ठिकाणी ईभ्रतीचा प्रश्न असतो. म्हणजे घरात पाॅश  पाहुणे येतात. त्यांच्या पुढे म्हातारे आईबाप कसेबसे वाटतात म्हणून वृध्दाश्रमात सोय होते.
        पण वरील ब-याच प्रश्नांनांच्यामुळाशी पैसा नावाची आभिलाशा आहे. त्यामुळे आम्हाला आमचे जन्मदाते सुध्दा गौण वाटायला लागतात. पैशाची भूक फार भयंकर असते .माझ्या तरी पाहण्यात अशी व्यक्ती नाही ,ज्याची तृष्णा शमली आहे. अंबानी आडानी मल्या सारख्या नवकोटनारायनांची भूक शमली नाही जे आज जगातली दहा श्रीमंत पैकी एक आहेत. पैसा मानसाला आईवडिलांना सोडायला लावतो.आणि तो दूरवर मानसाला घेऊन जातो. आणि मातीची नाळ तोडून टाकतो.तो नाती ही तोडतो.नि सख्खा भाऊ वैरी होतो.
              आम्हाला दोन दिवसांपूर्वीची घरात आलेली  पत्नी आवडू लागते.तिने सांगितलेल्या गोष्टी आम्हाला ख-या वाटू लागतात. आईपेक्षा बायकोवर जास्त विश्वास बसतो.क्षणात आई कैकयी वाटू लागते.बायकोसाठी आमची जान हजीर असते.आईपासून मुलगा दूर जातो.कालपरवा आईच्या मागे फिरणारा बायकोच्या मागे घुटमळत फिरतो. काळजाचा तुकडा दूरदूर जाऊ लागतो.मग घरात संघर्ष सुरू होतो.बायको जिंकते .घरात खटके नको म्हणून आईबरोबर वडील पण वृध्दाश्रमात आपलं राहिले आयुष्य कुंठीत बसतात.आयुष्यभर काडीकाडी जम झाली की आपण कमविलेले सारे वैभव ती काळजावर दगड ठेऊन सोडून येते.कुणी तरी अमेरिकेत रहातो म्हणून आईवडिलांना येथे सोडतात.कुणी घरात अडचण नको म्हणून आईवडिलांना येथे सोडतात. वृध्दाश्रमात कुणीच खुशीत येत नसतो.पण नियतीने वाढलेले पूर्वसंचित म्हणून गुमान सहन करतात.
       खरंतर आयुष्यभर आईबांनी पै पै जमवून   घर ऊभे केलेले असते.  राबराब राबतात.सकाळी सहा वाजता घरातून निघालेला बाप रात्री उशिरा यायचा. तो रात्री  उशिरा घरात यायचा. झोपलेली लेकरं पाहून हिरमूसळा व्हायचा  मुलांशी खेळायला विसरायचा. बोलायला विसरायचा. धड बायको बरोबर तो बोलत नसायचा."मुलं मोठी झाली की आपण असं करू, तसंकरू "" अशी स्वप्नं तो पाहायचा. खरं तर आईबाबा जगायचं राहून गेलेले असतात."मूलं मोठी झाली की..."हे त्याचे वाक्य अखडले जाते.आता त्यांना खूप बोलायचे असते पण कुणाशी बोलणार. या मुक्या भिंतीबरोबर की स्वतःबरोबर.पण स्वतःबरोबर बोललं की लोक त्याला वेडा म्हणतात. आयुष्यात सोसलेत ते सांगायचे असते त्यांना मुलाला सुनेला. शेजारीपाजारी बरंच सांगायचे असते. आता कुणाला सांगायचे. देवपूजा करायची असते;मनसोक्त जी नेमकी घाईघाईने केली जायची. नातेवाइकांच्या लग्नात मिरवायचे असते.पारावरती जाऊन गप्पा झाडायच्या असतात. कधी तरी मित्रांबरोबर चावट बोलायचे असते.आता ते सारे राहीले होते.
            प्रत्येक आईवडिलांची एक तीव्र  ईच्छा असते. नातुला मांडीवर घेऊन त्याला खेळवावे.त्याचे ईवले ईवले हात धरून गल्लीत फिरवावेत.त्याला रामायण महाभारतातील गोष्टी सांगाव्या.कधी तरी नातवाने धोतर छराब करावे आणि मुलगा आला की त्याला सांगवे "अरे आज ना बाळाने माझे धोतर खराब केले.'" ; तू पण असाच होते हो.' नातवाल आंघोळ घालावी त्याची दृष्ट काढावी असं सगळ्याच आजींना वाटतंय .पण आज ते आसतात माणसकीच्या कैदेत आपल्या मुलाने बापासाठी तयार केलेली.  काही आईबाबांच्या वाट्याला आपल्याच घरात विजनवास आलेला असतो. कारण घरात छान छान पाहुणे येतात.मग त्यांच्या समोर म्हातारे आईबाप कसे बर वाटतात.?म्हणून म्हाता-या आईबाबांना घरातील एक खोली दिली जाते. ती खोली म्हणजे त्या लाचार जीवांचे विश्व. तेथेच खाणेपिणे,तेथेच गप्पा नि तेथेच सारे आयुष्य ही जीव जगतात.
                 खूप वर्षांपासून पै पै जमवून घर ऊभे केलेले असते.खिशाला मुरड घातलेली असते.तोंड शिकवलेले असते. स्वतःसाठी कारभारणी काही घेतले नसते.
आता थोडी उधळपट्टी करायची असते.कीर्तणाला जायचं राहीलेले असते.पत्यांचेडाव रंगवायचे असतात. पण कुणाशी बरोबर पत्ते खेळायचे. आईवडिलांनी. मग काय करणार हे म्हातारे जीव शून्य नजरेतून बाहेरचे जग न्याहाळत असतात.मृत्यूची वाट पहात.पण दोघांनाही भीती असते. आपल्या नंतर ही किंवा हा कसा जगले.तोंड असून बोलता येत नाही. दात असून खाता येत नाही. डोळे असून
पहाता येत नाही. जगणं फार भयाण असते.स्वतःच्या घरात ते पाहुणे असतात.डोळ्यांच्या खाचा करून करून फक्त ते मृत्यूची वाट पहात असतात. मृत्यू ही त्यांना छळत असतो.तो येतच नाही मग जगणं अजूनच कठीण होते. ते रोज वाट पहातात पण तो येत नाही.
         एकीकडे शरीर साथ देत नाही तर दुसरीकडे आमच्याच हाडामासाचे गोळे आमच्या रक्ताने थेंब आम्हाला छळत असतात. अशा वेळी हे यमदेवता तू का बरं आम्हाला प्रसन्न होत नाही असे ते देवाला विनवत असतात.
      खरं तर ही त्यांच्या आयुष्याची ती सुरेख संध्याकाळ असते.पण ती रोजच भयाण होत जाते.
नाती तकलादू होतात.प्रेम तकलादू होते. म्हातारे आईवडील म्हातारा पणात काय मागतात हो.दोन प्रेमाचे शब्द थोडी चिमूटभर सहानुभुती. थोडासा आदर नि आभाळभर माया.जी त्यांचा नातू देणार असतो.दुखले खूपले तर मुलाने आपुलकीने विचारावे " बाबा बरे नाही  वाटत?" बस्स म्हातारे आईबाप पैशावर नाही प्रेमावर जगत असतात. शेवटी आपण काय तारुण्यात कायम राहणार नाही. आपल्या ही वाट्याला म्हातारपणी येणारचं.मग तौमची मुलंही तुमचा कित्ता गिरवणा नाही या भ्रमात राहू नका. कारण तो ही एक संस्काराचा भाग आहे. ते तुमच्या मुलांवर नकळत होणारच.ते थोड्या दिवसाचे पाहुणे आहेत. ते अचानक जातील एक दिवशी. ...

प्रा.श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
   पोई कल्याण ठाणे

शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

तुम्ही what's app वर आहात का?

एखादा जुना मित्र अथवा ओळखीचा चेहरा दिसला की सहज थोड्या गप्पा होतात मग एक प्रश्न विचारला जातो. "तुम्ही what's App वर आहात का ?" झालं बोलणं आपोआप आखडलं जातं.पुढे एकमेकांचा नंबर घेतला जातो काल भेटलेल्या मित्रा कडून "Hi" संदेश येतो.आपण पण हाय~~" असा प्रतिसाद देतो.अधेमधे एखादा गुळमुळीत झालेला संदेश काॅपी पेस्ट करून धाडतो.समोरून ही मचूळ सगळ्या ग्रुप वर चोथा झालेली कविता येथे.पुढे अशीच गर्दी व्हाटस्अप वर वाढत जाते. नाती तयार होतात. वेगवेगळे ग्रुप तयार होतात. आपण त्या समुहाचे सदस्य होतो.येथे नवीन काय काहीच नसते.फेसबुकचे फोटो. येथे येतात येथून तेथे जाणार. काॅपी पेस्ट स्वनिर्मित असे काही नसते. काही काम नाही मग द्या शुभेच्छा. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री,इतकंच काय रविवार च्या पण शुभेच्छा येतात. जशी मानसांना किंमत नाही तसंच शुभेच्छांचं झालय.फक्त वेळ घालवूपणा चालू आहे. शुभेच्छांना किंमत उरलेले नाही. दिवसभर माणूस वाॅटस अॅप मधे दंग असतो.दूरच्या माणसांशी बोलत असतो.आणि जवळ असणा-या माणसांशी बोलायला त्याला वेळ नाही किती अजब गोष्ट पहा. बरं वाॅट्स अॅप वर समूह एवढे की मोजता येत नाही. बरं समुहावर काय नवीन काहीच नाही दुनिया गोल आहे हे सिध्द होणारी गोष्ट कारण एखादा चांगला मजकूर आपण पाठवला की काही दिवसात तो पुन्हा आपल्यालाच येतो.तेच फोटो तेच शब्द तेचा मजकूर .बरं काही समुहात अश्लीलता एवढी असते की सांगता सोय नाही. आपण किती निर्लज्ज आहोत. की दुस-याला काय पाठवावे तेही आम्हाला कळत नाही. बरं जे जोक येतात ते थोरांच्या नावाने. आपण आपल्याच महान पुरुषांशी विटंबना करतो हेही आम्हाला कळत नाही. . मित्रहो माणसं जोडा संगळ्यांबरोबर बोला विचारांची देवाने घेवाण होऊद्या.प्रत्येकाचे विचार वेगळे आपण आपले विचार दुसर्यावर लादू नका. मी म्हणतो तेच खरे हा हट्ट सोडा.दुसर्याचे चांगले विचार त्यांच्या नावासह पाठवा .साहित्यचौर्य हा गुन्हा आहे. शेवटी खोटेपणा उघड होतोच. चांगल्या ग्रुप वर याची चर्चा होतेच. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय आहे. कारण नसताना इतिहास दूषित करू नका. खोटं लिहून. या पुस्तकात असे लिहले आहे. याचे दाखले देवू नका.हसा आणि हसवा.अस्सल विनोदंची देवानघेवान करा मनोरंजक माहिती दुसर्यांना पाठवा. आफवा पसरून देवू नका. खात्री चे वृत्त पुढे पाठवा. परस्त्री माते समान मानून कोणत्याही अनोळखी महिलेची छायाचित्र,व्हिडीओ पोस्ट करू नका चुकीचा व्हयरल झालेला फोटो, व्हिडीओ रोखणे फार आवघड तेव्हा पोस्ट करते वेळी काळजी घ्या. विनोदाने पाठवलेला एक शब्द एखाद्या चे जीवन संपवू शकते. एखादा बदनाम होऊ शकतो हे विसरून चालणार नाही. व्हाटस्अप वर किती मित्र आहेत त्या पेक्षा ते कसे आहेत हे फार महत्वाचे. आपल्या व्हाटस्अप वर किती गर्दी आहे. या पेक्षा आपण नाती कशी सांभाळत आहोत याला महत्व आहे. दूरचे मित्र जवळ येतात. मात्र समोरासमोर होणा-या गप्पा रंगत नाही ही खंत आहे. पारावरच्या गप्पा बंद होत आहेत. राजकारणातील गप्पा जवळ जवळ नामशेष झाल्यात.वाचन कमी होत चाललं आहे. पुस्तकांची कपाटे बेवारशी पडली आहेत. वाचनालय नि तेथील कर्मचारी वाचकांची वाट पहात आहेत. आणि आम्ही तरूण गुरफटुन गेलो आहोत . वाॅट्स अॅप वर. आता आम्ही लिहणं ही हरवतो की काय अशी वेळ आली आहे. पैशाचा नि वेळेचा अपव्यय होत आहे आणि आम्ही म्हणतो वेळ नाही. सुसंवाद विसरलोय आम्ही. गप्पांचे फड विसरलोय आम्ही. वाॅट्स अॅप ची गरज किती? महीत नाही. पण आम्ही खो खो हसणे विसरलोय .माणूस माणसाला विसरला आहे. प्रा.श्री. धनाजी जनार्दन बुटेरे पोई कल्याण ठाणे

शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

हे जीवन सुंदर आहे. (लेख)

                            निसर्गाची सर्वात सुंदर रचना म्हणजे माणूस. मानव म्हणजे त्याला भावभावना आल्याच.कोणी सुखी तर कोणी दुःखी. सुखाने माणूस हुरळून जातो तर दुःखाने खचून जातो.ही प्रक्रिया अव्यहतपणे निरंतर चालू आहे. कुणाच्या वाट्याला फक्त दुःखच आहे तर कोणी जन्मतःच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन येतो.हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो.पृथ्वीवर जसे खाच खळगे आहेत, तसे मानवी जीवन सुख दुःखाने भरलेले आहे. यात राणी कुंती सारखी व्यक्ती ती दुःख पचवते.पण कमजोर दिलाचे तेथेच आपली जीवनयात्रा संपवितात.मानव जन्म पुन्हा आहे की नाही माहित नाही संत ही म्हणतात नर देह तेतीस कोटी योनीतून जन्म घेतल्यावर मिळतो.म्हणून संत मानवीदेह हा दुर्लभ आहे असे म्हणतात. म्हणून या जन्मात नर देहाचा आनंद घ्या.
            व्यक्तीपरत्वे सुख दुःखाच्या व्याख्या बदलतात कुणी नापास झाला म्हणून जीवन संपवितो, कुणी कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या करतो. कोणी मेरीट थोडक्यात हुकली म्हणून आत्महत्या करतो. तर कुणी मेरीट मधिल पहिला नंबर चुकला म्हणून आत्महत्या करतो. येथे अती महत्वाकांक्षा हे दुःखाचे मूळ आहे हे लक्षात घ्या. विश्वात कोणत्याही गोष्टी परीपूर्ण नाही मग मी परीपूर्ण कसा असेन ? हा प्रश्न स्वतः ला नेहमी विचारा.चंद्राला पूर्णत्व येण्यासाठी अपूर्णातून जावे लागते निरनिराळे आकार धारण करावे लागतात तेव्हा कुठे पूर्ण चंद्र तयार होतो.मला प्रत्येक गोष्ट लगेच कशी मिळेल? मला जर खरोखरच सुखी व्हायचे असेल तर मी माझ्या पेक्षा गरीब माणसाकडे पाहिले पाहिजे. मुक्याने पागळ्याकडे पाहून सुखी व्हायचे. पागळ्याने आंधळ्याकडे पाहून सुखी व्हायचे. आणि आंधळ्याने पक्षाघाताने वाचा गेलेल्या,  अंथरुणात निपचित पडलेल्या मानसाकडे पाहून सुखी व्हायचे.
शेजारी फ्रिज आहे एसी.आहे. आपल्या कडे नाही तर आयुष्यात कायम दुःखी रहाल.आहे त्यात सुख माना सुख पायावर लोळण घेईल. मात्र स्वप्नांच्या मागे धाऊन अपयश आले तर दुःख न मानता जे प्राप्त होईल त्यात आनंद शोधा जीवन सुंदर होईल.
             आयुष्य जगताना खेळकर वृत्तीने  सामोरं जा.रस्त्यावर जाताना पाय घसरून पडलात.लोक खो खो हसणार तुम्ही ही हसा.पडल्याचे दुःख वाटणार नाही. पण आता आपण पडलो. म्हणून लोक हसतील हा विचार घेऊन ऊठलात तर नक्कीच दुःख व्होईल.
बरीच माणसं पडल्याने दुःखी होत नसतात .तर पडल्यावर लोकांनी पाहिले या गोष्टींवर दुःखी होतात.
   लहान मूल पडले म्हणून रडत नाही सगळे आपण पडल्यावर हसले याचे वाईट त्याला वाटते म्हणून ते रडते.विदूषक हा सर्कसमध्ये लोकांची हसवणूक व्हावी म्हणून निर्माण केलेले पात्र पण त्याच व्यंगाचा उपयोग तो आपल्या चरितार्थासाठी उपयोग करून आनंदी होतो.
             माझ्या परीचयाचे जोशी दांपत्य आहे सुखीकुटुंब म्हणून लोक त्यांच्याकडे बोट दाखवतात . पण सौ.जोशी यांच्या आनंदाची कल्पना मध्येच बदलली आणि जोशी दांपत्य दुःखी झाले. सौ.जोशी यांना सोन्याच्या दागिन्यांनचा मोह झाला. जोशी काकांनी कर्ज काढून बायकोची हौस भागविली.आणि काकांची कर्जाचे हफ्ते नि कुटुंबाचीा जबाबदारी सांभाळत सांभाळत नाकी नऊ आले. मिळणारी मिळकत तुटपुंजी त्यात घर ,कर्जाचे हफ्ते, सण ऊत्साव, पाहुणेराऊळे यात काका वैतागून गेले. काकांचा पेपर बंद झाला, दाढी हाताने झाडू लागले. इस्त्रीला परीट लागायचा आता हाताने इस्त्री होते.
रिक्षा बंद झाली. पायपीट वाढली.केबल वाला बंद झाला. सुटीचे फिरणे बंद झाले.काकुंना फरक नसेल पडला पण काकांना नक्कीच पडला. आता दागिन्यांनी हौस ती मेली केवढी पण काकांच्या आनंदात विरजण पडले.मग आता मला सांगा सुख ते काय?
         अभिलाषा ही केंव्हा केंव्हा माणसाला दुःखाकडे ओढते.मला ऐश्वर्या सारखी सुंदर बायको हवी.सुंदर समजू शकतो पण ती " एश्वर्या  "सारखीच
का असली पाहिजे? माझ्या कडे कार हवी.पण ती मर्सीडीजच का?झोपडीत राहणारा टुमदार कौलारू घराचे स्वप्न पहातो. त्यात वावगे काहीच नाही. पण बंगला असणारा हवेलीचे स्वप्न पहातो. हवेलीत रहाणार राजवाड्यांचे स्वप्न पहातो. येथे अभिलाषा ही दुःखाचे मूळ आहे. नगरसेवकाला वाटते आमदार व्हावे. आमदार म्हणतो नामदार व्हावे. मंत्री म्हणतो मी मुख्यमंत्री व्हावे. मुख्यमंत्र्यांला वाटते सर्व महत्त्वाची खाती आपल्याकडे असावी. किंवा आपण केंद्रीय मंत्रीमंडळात असावे.किंवा आपण पंतप्रधान असावे.पंतप्रधानाला वाटते ही खुर्ची मरेपर्यंत कुणालाच भेटू नये म्हणजे कोणीच समाधानी नाही. सर्व मिळून सुध्दा माणूस आत्मसंतुष्ट नअसल्यामुळे तो दुःखी आहे. परंतु मूळ कारण अभिलाषा हेच होय.
          संसारात सर्वत्र दुःखाचे मळभ दाटलेले आहेत. आपण त्यामधे आपला आनंद शोधला पाहीजे."पेला अर्धा भरलेला आहेत "म्हणून सुखी व्हायचे .' की " पेला अर्धा रिता आहे. "म्हणून सुखवस्तू व्हायचे हे आपण ठरवायचं. मुलगी झाल्यावर बाप झालो याचा आनंद मानायचा की वंशाच्या दिव्यांचे काय?म्हणून दुःख मानत बसायचं हे आपल्या हातात आहे.
       सुख प्रत्येक गोष्टीत आहे. मदरतेरेसाना ते दीनदुबळ्यांच्या सेवेत सापडले.बाबा आमटेना महारोग्यांच्या सेवेत मिळाले. गाडगे महाराजांना समाजसेवेत सापडले. लता मंगेशकरांना गाण्यात सापडले. सिधुताई सकपाळ यांना निराधार मुलांनमधे गवसले.दुस-याला सुखी करून  स्वतःही सुखी झाले.
        आपल्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. त्या आपणास सुखवादी बनवतात.कधी निराशा पदरी पडते.मग कपाळमोक्ष ठरलेला म्हणून समजा.चिमूटभर सुखासाठी माणूस आभाळभर सुखाची होळी करतो.आकाशातील चांदण्या हातात येत नसतात. त्या पाहून सुख मिळवा.राजा महालातून असतो पण तरी तो सुखी नसतो.खरं सुख गवताच्या झोपडीत असते. पैशात सुख मानणारा वर्ग फार मोठा आहे. पण पैसा दुःखाचे मूळ कारण आहे. पैशात सुख असते तर जगातील दहा श्रीमंत सर्वांत सुखी असते.पण तेमुळीच सुखी नाही. सुख हे क्षणभंगूर आहे. ते नश्वर आहे. दुःख माणसांचे सोबती आहे.
कारण ते मानसाची पाठ सोडत नाही.
              प्रा. धनाजी जनार्दन बुटेरे
                -   पोई कल्याण ठाणे
                    

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

चारोळी

                  चारोळी

1)         तू यावे कातरवेळी
            आणि मीठीत आकाश यावे
             तू गूजगोष्टी करता
             क्षितीजाला चुंबून घ्यावे ॥

2)       तुझ्यावर लिहीताना,
         मन कागदावर भरभर येते.
         दुःखाच्या गावात,
         मन सैरभैर फिरून येते ॥

3)     तुझ्यावर लिहावं म्हटलं,
        की शब्द रक्तबंबाळ होतात.॥
        दुख-या मनाचे ,
        काय गं हाल होतात.॥

4)      माती म्हणे कुंभारा,
         काय काय माझ्या नशिबात ॥
         कोण अस्ती भरणार
         तर कोण खापर घेऊन
         फिरले गात गात. ॥

5)     काय ते हात जादूई
        मातीचे पुण्य फळा आणतात.॥
        तिच माती आकार घेते
        गाडगी मडकी तिची बनतात. ॥

6)      थरथरत्या हातांना आता
         तुझीच केवळ साथ हवी.॥
         वृध्दपणाने छळले नुसते
         त्यावर मजला मात्र हवी ॥

7)      वेदनेला अंत नाही
         जीवनात सुखाचा मेळ नाही. ॥
         गाढवा सारखे जगतो.
         जगण्यास वेळ नाही. ॥

8)       सांजावतांना डोळे पाणावतात
           नि क्षितीज काळे कुट्ट होते.॥
           तुझ्या नुसत्या आठवणीने
          माझी वेदना जन्म घेते.॥

9)       तुझे नयन का रे छळती.
          मी पहाते तुला त्याक्षणी.॥
          का छळसी असा मुकुंदा
          मी घायाळ पक्षिणी  . ॥

10)     आयुष्याचं झालय ओझं
          ते फरफटत फरफटत नेते.॥
          द्रारिद्रपण असं ना
          ते पाठीवर बसून रहाते.॥

11)       तुझा पैंजण सांगतो
            माझा स्पर्श हवाहवासा असतो.॥
            मग वेडा हात पायावरच
            घुटमळतो बसतो ॥

12)      भरलं घर आज
            सुनं सुनं झालं.॥
            लेक सासरला निघाली.
            नि आभाळ भरुन आलं.॥

13)      घरट्यात वाढलेले
           पिल्लू आज उडणार आहे. ॥
           अस्ताला जाणारा सूर्य
           शोकात आज बुडणार आहे. ॥

14)      कसं आठवू वेडे क्षण
           काळजात कोरलेले॥
           आज माझं कुणी
           काळीज चोरलेले.॥

15)       दिवस कसे बघ भरभर
             समोरून रांगत गेले. ॥
          :  मला नाही तुझ्या ह्रदयात
             घर बांधता आले. ॥

16)        तुझ्या किलबिलाटाने
             घर कसं जागे व्हायचे. ॥
             शब्द रात भर डोळ्यात
             जागे रहायचे॥

17)       आभाळ भरून चांदण्या
            आज एक ही हसत नाही ॥
            माझं नक्षत्र आभाळ सोडून गेलंड
            मी शोधते पण का बरं दिसत नाही. ॥

18)      आभाळ भरून चांदण्या
            आज एक ही हसत नाही ॥
         :   माझं नक्षत्र आभाळ सोडून गेलंड
             मी शोधते पण का बरं दिसत नाही. ॥

19)      तुझ्या ह्रदयी कोण रहाते  ;
            मी पहाणार आहे. ॥
            तो गेल्यावर मी तिथेच
            रहाणार आहे. ॥

20)    आता तुझ्यावरचं प्रेम ,
          उडत चाललंय. ॥
          अस्ताला जाणा-या सूर्यासारखं
          बुडत चाललंय. ॥

21)   आभाळभर केली माया.
         तुला कळलीच नाही. ॥
       आता कशी लिहू अक्षरे
        आता संपली ती शाई.॥
       
22)    दारूड्यांचे बरं असतं
         पिऊन दुःख तरी लपविता येते.॥
         शिव्या हासडून काहीही
         खपविता येते. ॥


श्री धनाजी जनार्दन बुटेरे
मु.पोई; पो.वाहोली.
ता.कल्याण  ; जिल्हा. ठाणे
djbutere@rediffmail.com

रविवार, २ एप्रिल, २०१७

आई म्हणजे (मराठी कविता )

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

*आई म्हणजे.......*

आई म्हणजे माती
रोपट्यासाठी झुरणारी
वादळाच्या घरात,
रोपट्यासाठी उरणारी.

आई जळती मशाल
अंधारात एकटी जळणारी
ओंजळभर प्रकाशनासाठी
वात होऊन जळणारी.

आई रानातील झरा
प्रदेश समृद्ध करणारा.
दूरवर वाहत जाऊन
पाऊस होऊन पडणारा.

आई पावसाची सर
झरझर झुरणारी
जमिनीच्या प्रेमापोटी
पाऊस होऊन पडणारी.

*प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
      पोई कल्याण ठाणे
             *अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य षरिषद पुणे
      (कल्याण ग्रामीण )

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

प्रिय आई

प्रिय आई
       आई तशी तू आंगठे बहाद्दर तुला पत्र लिहायचं म्हटलं तरी वाचायला तू " अक्षरशत्रू" तुझ्याशी काही गोष्टी बोलता पण येत नाही.पण आज तुझ्याशी थोडेशे हितगुज करणार आहे.आई तुला मी जेव्हा पहातो.तेव्हा मला राणी कुंतीची आठवण येते.कारण तिने दुःख मागुन घेतले आणि आयुष्यभर दुःख तीला गोचिडा सारखं चिकटून गेले.तू दुःख मागितले नाही.पण दुःखाने तुला आपले सांगाती म्हणून निवडले.आणि आयुष्यभर दुःख तुला चिकटले.पण तरी तू डगमगली नाहीस.
        ऐन तारुण्यात कपाळीचे कुंकू पुसले. नटण्या मुरडण्याचे वय तुझे  पण आदिम स्त्री सारखी जगलीस. बाबा हे जग सोडून गेले; तेव्हा पदरात तीन चिल्लेपिल्ले मागे सोडून गेले.तू दुःखाला नाही कवटाळत बसलीस तर तू त्यावर मात केलीस,तू आमचा बाप झालीस.वादळात दिवा जीवंत कसा ठेवावे मी तुझ्या कडून शिकलो.काटकसरीने कसं जगावं तू शिकविले.
                    आई शेतात बैला सारखी राबलीस,सर्व पुरुषी कामे तू लाज पदराला बांधून शिकलीस.भाताच्या एक एकराच्या शेतात हाती विळा घेऊन तू हळूहळू करतकरत एकराचे शेत तू आडवी करायचीस.मग भाताचे भारे बाधून खळ्यात आणायचीस झोडून भात काढायचीस गडी माणसाने करावे ते तू केलस.सोबतीला आम्ही असायचो पण शेताच्या बांधावर बसण्या पुरते.आई ,पावसाळ्यात तू भाताचीलावणी  करायचीस आणि मी बांधावर ईरल्या खाली बसून तुला सोबत करायचो. आम्ही लहान होतो.पण तुझं घर कसं चालायाचे माहीत नाही.वेळ प्रसंगी लोकांपुढे हात पसरले पण वेळ निभावून नेलीस .
             बाबा आजरी होते चार वर्षे अंथरुणावर खिळले होते.पण पतीची सेवा कशी करतात मी तुझ्याकडून शिकलो.मला मदर तेरेसा तुझ्यात दिसायची.सर्व दागीने बाबांच्या आजारपणात विकलेस आणि लंकेची पार्वती झालीस.पण कधी साधं बोलली सुध्दा नाही.की कुरबूर नाही.तसा तुला नटायलाही आवडत नाही.पण आई दाद देतो तुझ्या हिमतीला बाबांचा तू भक्कम आधार झालीस.
               ऐकलं होतं तू सासूरवासपण भोगला.तुझी सासू म्हणे छळायची तुला.आई तू गुमान सहन केले.उलट म्हणाचीस नियतीने वाढून ठेवले आहे तुला.दिवसा शेतात राबून आल्यावर रात्री तुझी सासू दळण दळायला द्यायची,सर्व जेवल्यावर तू जेवायचीस मग भांडी घासून रात्री ऊशीरा झोपायचीस आणि सगळ्यात आधी तू उठायची.कसं गं जमलं तुला.एवढं करून म्हणे बाबांच्या हातून मारपण तुच खायचीस.पंधरा माणसांच्या कुटुंबात तू "थोरली जाऊ "पण कधी तुला तोराच मिरवता आला नाही.मग तुझा तू वेगळा संसार थाटला तुझ्या ख-या आयुष्याची सुरुवात झाली नि नवरा आजरी झाला.डोळ्यात तेल घालून रात्रभर जागलीस शेवटी नशीबाने दगा दिला.आणि आकली वैधव्य तुझ्या नशिबी आले.पण तू मान नाही झुकवलीस कुणा पुढे.
       आई तू एकदा आजरी पडली होती.आमचे धाबे दणाणले होते.तुझ्या ऑपरेशन साठी पैसे ही नव्हते.मला तर बाबा तुलापण वर बोलवतात असे वाटे.कारण बाबांना तुझी सवय लागली होती.पण देवाला आमची कीव आली नि आई तू आपोआप बरी झालीस.मी तुला तेव्हा हादरताना पाहिली होती;नाहीतर संकटावर तूच स्वार होतेस.
         आई काबाडकष्ट केले.पण लेकरांच्या हातात पाटी द्यायला नाही विसरलीस,लेकरांनी शिकावं हाच तुझा ध्यास.मला आठवतं आई, मला परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते.तेव्हा तू तुझा उरला सुरला एक दागिना "मंगळसुत्र" तू हसत हसत काढून मोडलं होतं.आणि माझ्या शाळेची फी भरली होती.आई मी अभ्यास कराला बाहेर कुठेतरी झाडाखाली बसायचो तू तेथे जेवणाचे ताट नि तांब्याभर पाणी घेऊन यायचीस मी गपागप जेवताना यू कौतुकाने पाहायचीस तुझ्या पदराला मी हात पुसायचो नि मग तू निघून जायची.तुला वाटयचं लेकरू शिकू दे नि दैन्य मिटू दे,आई पहाटे चार वाजता ऊठून पाच वाजता गरमागरम भाकरीची न्याहारी करणारा जगातील मी भाग्यवान लेकरु असेन.आई,घरातून कधीच उपाशीपोटी तू बाहेर पडू दिले नही.बाबा गेले पण तू कधी जाणवूही दिले नाही.शाळेत घालायला एकच सदरा असायचा पण तो नेहमी स्वच्छ असायचा .काबाडकष्ट केले पण कधी फाटक्या कपड्यात शाळेत जायची वेळ आली नाही.
       आई आठवतो का गं तो दिवस मला नोकरी लागली.खरं तर तुला आनंद व्हायला पाहिजे.पण आई ;तू फार दुःखी झालीस.आरण मी प्रथमच तुला सोडून दूर जाणार होतो.तू त्या दिवशी रात्रभर रडत होतीस हमसून हमसून रडत होतीस.तुझे मुके हुदके तुझे ऊसासे मी रात्रभर ऐकत होतो.आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्यापासून दूर जाणार होतो.तुझं ऐकून मीपण रडत होतो.
आणि आई सकाळी निघताना भावनांचा बाध फुटला आणि मायलेकरानी टाहो फोडला.आई ,
तुझ्या शिवाय जगताच येणार नाही असं सारखं वाटायचे.पण तुझ्या आशीर्वादाने सारे निभावले
        आई आता थकलीस गं ;तरी तुझी वणवण थांबत नाही.लेकरांना आता पंख फुटले आहेत.सुना नातवंडानी घर गजबजलेलं असतं.घराचं गोकुळ झालय.आई तुझ्या सुनांना तुझं त्याग बळीदान नाही माहित.तू सासूरवासपण भोगलं.पण तुझ्या सूनासाठी तू सासू कधी झालीच नाही.बोलल एखादी उलटसुलट कारण आता तुझी पानझड झाले. अन् बरं का आई एखाद्या दिवशी भुर्रकन उडून जाशील.बाबा सारखी.

         श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
          पोई, कल्याण, जि. ठाणे